सहजीवन
शैला गुंजाळ
शाळा सुटली तशी मायरा धावत
सुटली आणि पायात पाय अडकून पडली. मी थोडा लांब उभा होतो. तिला पडलेले पाहताच मी
तिला उचलण्यासाठी जाऊ लागलो, त्या आधी एका मध्यमवयीन स्त्रीने मायराला उचलून जवळ घेतले होते आणी तिचे डोळे
पुसून तिच्या खरचटलेल्या गुडघ्यातून जादूने बाऊ बरा झाला असं तिला भासवत होती आणि
मायरही रडता रडता खरंच बरा झाल का ते बघत होती. तितक्यात मी तिथे पोहोचलो तशी
मायरा माझ्या जवळ आली. मी त्या स्त्रीला थँक यु म्हंटलं आणि मायराचा हात धरून हळू
हळू घराच्या दिशेने चालू लागलो. आणि म्हणालो कशाला धावते, बघ लागलं ना तुला. दुखतंय का ग? आपण घरी पोहोचलो कि औषध लावू त्यावर बर होईल ते. तिने
होकारार्थी मान डोलावली.
दुसऱ्या दिवशी मला ती स्त्री
दिसली, आमची नजरेला नजर
मिळाली मी हलकीच स्माईल दिली. तिने हि दिली. गोरी-गोमटी, सडपातळ, तपकिरी रंगाचा कुर्ता-पायजमा त्यावर ओढणी, लांब केसांना पिन लावली होती. उजव्या खांद्यावर पिशवी
अडकवली होती. तिचे ते रूप लक्ष वेधून घेत होते. मला खरं तर ती आवडू लागली होती.
असेच काही दिवस गेले. आमच्यात जुजबी संभाषण सुरु झालं होतं. जसं कि उद्या कोणती
ऍक्टिव्हिटी आहे, कोणत्या रंगाचे कपडे घालायचे आहेत. एकदा अशीच ऍक्टिव्हिटी होती त्यामुळे मुले
उशिरा सुटणार होती. आम्ही वाट पाहत बाहेर उभे होतो. मी त्यांना विचारल कि कुठे
राहता तुम्ही?
ती : आनंदनगर.
मी : आनंदनगर? आम्ही नेहमी येतो तिथे. संध्याकाळचं. आजी-आजोबा
उद्यानात. मायराला आवडते तिथे खेळायला.
ती फक्त हसली. मुलं सुटली होती.
त्यामुळे पुढे काही बोलता आलं नाही.
संध्याकाळी मी नेहमीप्रमाणे
मायराला घेऊन उद्यानात गेलो. तर काय आश्चर्य! मला ती दिसली. माझ्या मनात विचार
आला. हि इथे आली म्हणजे मी काय समजू? हिच्या
मनात माझ्या विषयी जिव्हाळा असेल का? तसं नसतं तर ती तिथे कशाला आली असती? तिचा हि होकार आहे. आणि कदाचित आपलं नातं पुढे
नेण्यासाठी तिचा होकार आहे. असं मी माझ्या मनाला समजावलं. ती ज्या बाकावर बसली
होती त्या बाकाजवळ जाऊन...
मी बसू का?
हो बसा ना. ती म्हणाली.
मी बसतच होतो
तेवढ्यात...मायरा...आजोबा मला झोक्यावर बसायचं आहे. असा हट्ट करू लागली. मला
तिच्या सोबत जाव लागलं. ती खेळताना लक्ष देण गरजेचं होतं. ती ह्या झोक्यावरून, त्या झोक्यावर, घसरगुंडीवर आणि इकडे-तिकडे जात होती. थोड्याच वेळात
अंधार पडला. आम्हाला निघावं लागलं. बोलणं काही झालचं नाही. इथे पाच मिनिटांच्या
अंतरावर आमचं घर होतं. मी तिला विचारलं... तुम्ही येता का घरी? आम्ही ह्या कॉम्प्लेक्स मधेच राहतो. ती म्हणाली, मुलं दमलीयेत, उशीर हि झालाय, पुन्हा कधी तरी येईन.
असेच काही दिवस गेले. एकदा
शाळेत मुलांना सोडल्यावर मी त्या स्त्रीला विचारलं कि चहा घेऊया का? घरी जायची घाई नाही ना? तिने होकारार्थी मान डोलावली. आम्ही शाळेच्या जवळ एक उडपी
हॉटेलमध्ये गेलो. आणि एका कोपऱ्यातल्या टेबलावर जाऊन बसलो. खाणार का? मी विचारले. ती म्हणाली नको. चहा चालेल. मी दोन चहा मागवले.
मी तिला माझ्या बद्दल सांगायला
सुरवात केली. मी माधव परांजपे. वय वर्ष पंचावन्न. माझी अर्धांगिनी पाच वर्षापूर्वी
अल्पशा आजाराने हे जग सोडून गेली. मी, माझा
मुलगा महेश, सून मानसी, आणि माझी नात
मायरा...सोबत राहतो. मी बँकेत मोठ्या पदावरुन सेवानिवृत्ती घेतली आहे. आता मायराचं
माझं सर्वस्व आहे. तिच्या बरोबर वेळ घालवण्यात मला आनंद वाटतो. तिला मोठं होताना
बघणं किती आनंददायी आहे. तिला शाळेत सोडणं, घेऊन येणं, तिचा होमवर्क करून घेणं, तिची काळजी घेणं, तिला श्लोक शिकवणं, तिला भरवणं, तिच्या बरोबर खेळणं हे मी अगदी मनापासून करतो.
तितक्यात चहा आला. मी म्हणालो
चहा घ्या. मी हि चहाचा कप जवळ घेतला आणि तो पिण्यासाठी उचलून हातात घेतला. तिने तिच्या बद्दल सांगायला
सुरूवात केली. मी रुबिना पावसकर. तिचे नाव ऐकताच मला जोरात ठसका लागला. ती बोलता
बोलता थांबली तिने मला पाणी हवंय का? विचारल.
मी हातानेच...नको..ची खून केली. ती पुढे म्हणाली....मूळची मी कोकणातली आहे. आमच्या
लग्नानंतर सहा महिन्यातच माझे मिस्टर कार असिसिडेन्ट मध्ये गेले, कमनशीबी समजून सासूबाईने मला घरा बाहेर काढले. माझ्या खालाने मला आसरा दिला.
अरमान खालाचा नातू आहे. खालाचे मुलगा आणि सून चांगले आहेत, माझ्या तिथे राहण्याचा त्यांनी कधी आक्षेप नाही
घेतला. माझं स्वतःचं असं काहीच नाही. माझं डोकं सुन्न झालं होतं आणि मन खिन्न. काय
प्रतिक्रया देऊ मला समजत नव्हतं. मी घड्याळात बघितलं आणि म्हणालो शाळा सुटायची वेळ
झाली आहे. आपल्याला निघावं लागेल. ती हो म्हणाली. मी बिलाचे पैसे भरले. आम्ही चालत
शाळेच्या दिशेने निघालो, रस्त्यात काही बोलणं झालं नाही.
महेश आयटी क्षेत्रात असल्यामुळे
त्याला प्रोजेक्ट साठी यु. एस. ए. ला जावे लागणार होते. दोन महिन्यानंतर तो निघणार होता. मानसी आणि मायरा हि
जाणार होत्या त्याच्या बरोबर. माझं एकटपण ओघाने येणारच होतं. रात्री बिछान्यावर
पडलो. पण झोप काही लागत नव्हती. मनात विचारचक्र सुरुच होतं. खरंच माझ्या मनात
तिच्या विषयी जिव्हाळा आहे का? असं मी प्रेम का शोधत होतो, कि मला एकटेपणाची भीती वाटत होती? की माझ्या चांगल्या कर्माचे फळ म्हणून खरंच देवाने तिची माझ्याबरोबर भेट घडवुन
आणली होती? जिव्हाळा आहे तर मग
तिच नाव ऐकून माझ मन खिन्न का झालं? दुसऱ्या धर्माची बायको आणली तर लोक काय म्हणतील? लोकांचा विचार मी का करू? पण महेश-मानसीला काय आणि कसं सांगू? मला काही समजत नव्हतं काय करायचं ते. खरं तर
रुबीनालही सांगितलं नव्हतं कि माझ्या मनात काय आहे ते. मी माझ्या
मित्राचा...विजयचा सल्ला घ्यायचा ठरवलं.
दुसऱ्या दिवशी मी त्याला भेटलो
आणि सगळं सांगितलं. तो म्हणाला तू तिची नीट चौकशी केलीस का? तुमची तशी जुजबी ओळख दिसतेय. मला काही सुचत नाहीये तू
महेश आणि मानसीला सगळं सांगून टाक आणि तुझी लग्नाची इच्छा व्यक्त कर. त्यांची
प्रतिक्रिया जाणून घे. मला विजयचा सल्ला नेहमीच पटतो. आजही मी त्याने
सांगितल्याप्रमाणे करायचं ठरवलं.
कॉम्प्लेक्सच्या गेट मध्ये
महेशची गाडी येताना दिसली. आज तो लवकर आला होता. मी त्याच्यासाठी लिफ्ट जवळ
थांबलो. बाबा. त्याने हाक मारली.
मी: आज लवकर आलास?
महेश: हो, तीन मिटींग्स कॅन्सल झाल्या त्यामुळे लवकर आलो.
आम्ही घरी पोहोचलो होतो, त्याला बघताच मायरा त्याला येऊन बिलगली.
मायरा: बाबा... आज तू लवकर कसा
आलास? आई कधी येईल?
महेश: अग माझ बोलणं नाही झालं
आईशी. आपण फोन करू, मी फ्रेश होऊन आलो की.
मी त्याला कॉफी घेणार का? विचारलं, तो हो म्हणला. तो फ्रेश व्हायाला गेला आणि मी राधाला कॉफी बनवायला सांगितले, मी कॉफी घेऊन सोफ्यावर बसलो, तो हि आला, टीव्ही चा रिमोट घेतला आणि बातम्या बघू
लागला.
मी: महेश आज आपण डिनर ला जाऊया
का रे? म्हणजे... तुला जमत
असेल तर, कारण तू पण लवकर
आला आहेस? राधाने अजून
स्वयंपाकाला सुरवात केली नाहीये म्हणून विचारलं.
महेश: हो बाबा. जाऊया ना. मी
मानसीला विचारतो ती कधी पर्यंत येतेय ते.
मी: हो आधी कॉफी घे, थंड होईल. बघ जमत असेल तर डायरेक्ट यायला सांग तिला.
मी मग राधाला सांगतो स्वयंपाक नको करू म्हणून.
मानसी तयार झाली डायरेक्ट यायला
आणि मायरा खुश झाली. मी कॉफी संपवली. राधाला मायराला तयार करायाला सांगितले. मी
तयारच होतो. महेश ने गाडी काढली. जवळच्या रेस्टॉरंट मध्ये गेलो. ओपन स्पेस मध्ये
बसलो. हवेत सुखद अल्हादायक गारवा होता. वाऱ्याची झुळूक येत होती. मंद दिवे तेवत
होते. हळू आवाजात इंस्ट्रुमेंटल म्युझिक चालू होतं. प्रसन्न वाटत होतं.
मायराला तिचा फेव्हरेट पास्ता ऑर्डर केला आणि महेश ने मानसीला फोन करून विचारल कि ती कुठे आहे. जेवण काय
मागवू. त्याने फोन ठेवला. तसं मी त्याला विचारलं कि कुठे आहे ती? किती वेळ लागेल?
महेश: येईल दहा मिनिटात.
निघालीय ती.
मी: कस चाललंय तुझ? खूप थोडे दिवस राहिल्येत रे तुम्हाला निघायला, तयारी कुठं पर्यंत आलीये?
महेश: थोडी धावपळ चालू आहे
बाबा. दिवस पटापट जातात. अजून बरीच कामं बाकी आहेत. मला तुमची काळजी पण आहे बाबा, तुम्ही कसं करणार त्याची.
मी: मला पण सवय झालीये तुमची. माझं कसं होणार आहे देवजाणे, एकटेपण मला खायला उठेल. पण तू माझी काळजी करू नको, मला तो एकटेपण जाणवू नये म्हणून मी माझ्या साठी काही
प्लॅन केलेत.
महेश : कसले प्लॅन बाबा?
मी : लग्न करणार आहे मी
महेश थोडा हसून.... काय? खरं का बाबा? कधी झालं हे सगळं? कोणाशी?
मी: मानसीला येउदे...सगळं
सांगतो, तुमच्या
प्रतिक्रिया मला सांगा. तुम्ही जो निर्णय घ्याल तो मला मान्य असेल, तुमच्या निर्णयावर माझी काही हरकत नसेल. जेवणाची
ऑर्डर दे म्हणजे मानसी येई पर्यंत जेवण येईल.
मानसी आणि जेवण दोन्ही थोडया
वेळात आलं. मायरा तिचा पास्ता इंजॉय करत होती. मानसी बरोबर जुजबी गप्पा झाल्या आणि
मी मग दोघांनाही ती कोण आहे. आम्ही कुठे भेटलो. मानसी आणि महेश दोघांची काही हरकत
नव्हती आमच्या लग्नाला. लग्नानंतर तुमचे काय प्लॅन्स आहेत? असं मानसीने मला विचारलं.
मी म्हणालो... राहत घर आपण
भाड्याने देऊया का? मग तुम्ही भारतात परत आले कि बघूया काय करयाच ते, आम्ही दोघे गावी जाऊन राहू. माझी पेन्शन येते आणि
घरभाडे ही येईल त्यात होईल सगळं.
मानसी: पैश्याच काय एवढं बाबा? आम्ही हि देऊ काही लागले तर. हक्काने सांगा आम्हाला.
मी हसलो. मनातून खूप आनंदी झालो
होतो.
मला जुनेद चा फोन आला होता.
आमच्या बँकेत त्याचा इंटरव्ह्यू मी घेऊन त्याला सिलेक्ट केला होता आणि सगळं काम हि
शिकवले होत त्यामुळे तो कृतज्ञ होता.
दुसऱ्या दिवशी मायराला शाळेत
सोडवल्यावर रुबिनाला मी विचारले कि आपण चहा घेऊया का? ती हो म्हणाली. आम्ही नेहमी प्रमाणे उडपी रेस्टोरन्ट
मध्ये जाऊन बसलो. मी चहा आणि चीझ सॅन्डविचची ऑर्डर दिली. एका कोपऱ्यातल्या जागेवर जाऊन
बसलो.
मी: काय म्हणता? काय आणि कसं चाललय मग?
रुबिना: थोडंसं हसून... काही नाही... सगळं व्यवस्थित.
मी: तुम्ही कधी विचार केलाय का
स्वतःबद्दल, काही प्लॅन केलेत
का पुढील आयुष्याचे?
माझा अशा प्रश्नाने रुबिना थोडी
बुचकळ्यात पडली. अर्थातच तो प्रश्नच तसा होता.
रुबिना: खालाची सेवा करायची....जिने मला आसरा
दिला....आणि अरमानला सांभाळायच....ज्याच्या आई वडिलांनी माझ्या तिथे राहण्याला
काही आक्षेप घेतला नाहीये. हेच माझे प्लॅन्स.
मी: माझ्याशी लग्न करशील का?
ती एकदम स्तब्ध झाली. तिला हा
प्रश्न अनपेक्षित होता. ती बुचकळ्यात पडली होती. हो म्हणावं कि नाही....तिला समजत
नव्हतं. दोन मिनिटांसाठी आम्ही दोघे हि शांत झालो. दोघांचे धर्म वेगळे होते. पुरुष
म्हणून मी स्पष्ट बोलू शकत होतो. विचारू शकत होतो. स्त्री म्हणून ती कदाचित
स्वतःच्या सुखाचा विचार करू शकत नव्हती. किंवा आत्ता तरी तिने स्वतःचे विचार
सांगितले नसते. तिच्या मनात चाललेलं विचाराच काहूर मला स्पष्ट जाणवत होत. मी तिला
एका कागदावर माझा मोबाइल नंबर लिहून दिला आणि सांगितलं विचार करा, थोडा वेळ घ्या आणि कळवा मला तुमचा निर्णय. तो कागद
तसाच तिने घडी करून पर्स मध्ये ठेवला.
आम्ही तिथून निघालो. मुलं घेतली
आणि आपापल्या घरी गेलो. माझ्या मनातून तिचा विचार काही केल्या जात नव्हता. तिचा
होकार जरी असेल तरी ती तिची बाजू मांडेल का? आणि लग्नाची तिची इच्छा ती बोलेल का? परवानगी तरी कोणाची घेईल खालाची? जिने तिला आसरा दिला होता... कि खालाच्या मुलाची? ज्याने ती घरचा सदस्य असल्याचा आक्षेप घेतला नव्हता.
मायराला ताप भरला होता. मी तिला
क्रोसीन देऊन झोपवलं आणि मी सोफ्यावर मोबाइल घेऊन आडवा झालो. मोबाईलवर मॅसेज आला
होता अन्नोन नंबरवरून.... माझा होकार आहे आणि खाली पत्ता लिहिला होता. आणि रुबिना
अस नाव लिहिलं होत. मी खुश झालो होतो. फोन करू का ह्या नंबरवर कि मॅसेज पाठवतो असा
विचार करून मी.... ओके. थँक यु. असा मेसेज पाठवला.
रमजान चा महिना चालू होता रोजे
चालू असतील म्हणून दुपारी भेटायला जायचं ठरवलं. मानसी, महेश, मायरा, विजय आणि मी, आम्ही सगळे गेलो. आम्ही घरी पोहोचलो खालाला नमस्कार केला आणि
सोफ्यावर बसलो. तेवढ्यात जुनेद आला. मी आश्चर्याने त्याच्याकडे बघितले. त्याने मला
नमस्कार केला. तो रुबिनाच्या खालाचा मुलगा होता. रुबिनाने घरी पूर्व कल्पना देऊन
ठेवली होती, मी रुबीनाला मागणी घातली. जुनेद मला लग्नासाठी नाही म्हणणार नव्हता. ईद
झाल्यावर कोर्ट मॅरेज करायचं ठरवलं. महेश पुढच्या महिन्यात जाणार होता. चांगला
मुहूर्त बघून आम्ही लग्न केले. घरासाठी भाडेकरू शोधले आणि आम्ही गावाला निघालो.
आमचा संसार सुखात चालू आहे...
शैला गुंजाळ
disclaimer
सदर कथा अक्षरधन आणि वेलवेट कविशा यांनी आयोजित केलेल्या कथास्पर्धेतील आहे. या कथेतील आशय, विषय, मांडणी ही सर्वस्वी लेखकांची आहे. यातून कोणाच्या भावना दुखावण्याचा हेतू नाही. या कथेचे हक्क लेखकाकडे कायमस्वरूपी आणि वेलवेट कविशा यांच्याकडे ३१ ऑक्टोबरपर्यंत राखीव आहेत. परवानगीशिवाय कुठेही प्रकाशित करू नये.
0 Comments
Please do not enter any spam link in the comment box