मला साथ देशील ना भाग ७



मला साथ देशील ना भाग ७

©️ जया पाटील 

भाग सहा वाचा खाली दिलेल्या लिंकवर 👇

https://velvetkavisha.blogspot.com/2021/07/blog-post_12.html


"मघाशी माझ्या डोळ्यात दिसणारे प्रतिबिंब म्हणजे तू ...

आणि माझे खरं प्रेम म्हणजेच तू ....

आयुष्यभर मला तुझीच सोबत हवी आहे.

आयुष्याच्या प्रत्येक क्षणात मला तुझी साथ हवी आहे अनुराज..

मला आयुष्यभर तु फक्त माझा म्हणून हवा  आहेस ...

Be my happiness forever ...

will u marry me ..? 

माझ्याशी लग्न करशील ..? " 

असे म्हणून रागिनीने टेबलवरचे गुलाबाचे फुल उचलून अनुराजच्या समोर धरले.

रागिनीच्या या प्रश्नावर अनुराज मात्र अनुत्तरित होता.

खरं तर गेल्या सहा वर्षात अनुराज फक्त ह्याच क्षणांची वाट पाहत होता.

आज रागिनीने तिच्या मनातील भावना अनुराजला सांगितल्या होत्या.

खरं तर आजचा दिवस म्हणजे स्वप्नपूर्तीचा दिवस होता त्याच्यासाठी.

पण तरीही तो गप्प होता.

त्याचं असं मौन राहणं. 

रागिनीला खूप काही सांगत होतं

अनुराजच्या अश्या शांत राहण्यामुळे रागिनी संभ्रमात पडली.

आपण अनुराजला प्रोपोज करून चूक तर नाही केली ना ..

असे प्रश्न तिला सतावू लागले.

खरंतर अनुराज कडून तिच्या प्रेमाचा स्वीकार व्हावा अशीच इच्छा होती तिची.

पण ते शक्य नव्हते.

रागिनीने स्वतःला सावरले. 

आणि ती अनुराजला म्हणाली ...

" आय एम सॉरी , अनुराज...

मी असं अचानक सरप्राईज द्यायला नको होते तुला ...

इतके अचानक मी माझे प्रेम जाहीर केले.

आणि लगेच लग्नाबद्दल विचारले , 

ते नको विचारायला हवे होते.

लग्न हा आयुष्याचा निर्णय आहे.

आणि तो घेण्यासाठी मी तुला थोडा वेळ द्यायला हवा होता.

 Sorry , Take your  time .." रागिनी 

रागिनीच्या या बोलण्यामुळे अनुराज भानावर आला.

---------

"रागिनी , सॉरी म्हणू नकोस ग ...

खरं तर जे काही तू आज वागलीस.

हे स्वप्न होते माझे.

कॉलेजच्या पहिल्या दिवशी जेव्हा मी तुला पहिल्यांदा पाहिलं.

त्याच क्षणी मी तुझ्या प्रेमात पडलो.

खरंतर पहिल्या नजरेत आपण कोणाच्याही प्रेमात पडू हे मलाही स्वतःला मान्य नव्हते.

पण माझंच म्हणणं मीच खोटं ठरवलं.

तुझ्या प्रेमात पडण्यासाठी मला तो एक क्षणही पुरेसा ठरला.

त्यानंतर रोज तुझा पाठलाग करू लागलो.

काकांच्या आजारपणात जेव्हा तू कॉलेजला आली नाहीस, 

तेव्हाही खूप कासावीस झालो मी ...!

मनाची घालमेल थांबवू शकत नव्हतो,

म्हणून तडक तुझ्या घरी भेटायला आलो.

त्यानंतर तुझे प्रत्येक दुःख माझे दुःख होत गेले.

तुला आनंदी पाहण्यासाठी हवं ते करण्याची तयारी होती माझी.

आणि मी ते करतही गेलो.

पण तरीही कधीच तुला माझ्या मनातील भावना सांगू शकलो नाही.

मी हे नातं मान्य केलं तरीही ,

माझ्या घरी हे नातं कधीच मान्य होणार नाही.

आणि माझ्या घरच्यांना दुखावून मला स्वतः सुखी व्हायचे नाही.

माझी मजबुरी आहे ग ...!

त्यामुळेच आजवर माझ्या मनातल्या भावना दाबून मी चूप राहिलो.

मला खरंच माफ कर रागिनी ..

मला जे मनापासून हवं आहे. 

त्याला मी नाकारतोय.

पण माझी मजबुरी आहे.

मला खरंच माफ कर.

मी तुझ्याशी लग्न करू शकत नाही.

ही माझी मजबुरी असली तरी..,

माझ्या आयुष्यात मी तुझ्याइतके प्रेम दुसऱ्या कोणावरचं कधीच करू शकत नाही. 

तू माझं पहिले प्रेम होतीस आणि शेवट पर्यंत असणार आहेस...! " 

अनुराज बोलत होता.

----------

रागीनीचे विचारचक्र सुरु होते.

"अनुराजला मी आवडते तरीही तो मला स्वीकारू शकत नाही.

अशी कोणती मजबुरी आहे त्याची.

गेली सहा वर्ष अनुराजचे माझ्यावर प्रेम आहे.

पण सगळ्या भावना मनात ठेवून तो राहतोय.

का ..?

इतकी कोणती मोठी गोष्ट आहे.

जिच्यामुळे तो इतका मजबूर आहे.. ? "

रागिनीच्या डोक्यात विचारांचे काहूर माजले होते.

तिच्यासाठी खूप मोठा शॉक होता हा.

तरीही तिने स्वतःला सावरले.

आणि अनुराजसोबत बोलू लागली.

" अनुराज , 

मी समजु शकते.

प्रत्येकाचे कुटुंब त्याच्यासाठी प्रायोरिटी असते.

तुझे माझ्यावर प्रेम आहे.

हेच माझ्यासाठी खूप आहे.

आपलं नातं जगाच्या दृष्टीने लीगल असो.

अथवा नसो.

पण माझंही तुझ्यावरच प्रेम असेल आयुष्यभर ...

तू माझे प्रोपोजल स्वीकारले नाहीस.

दॅट्स ओके .

पण प्लीज ...अशी कुठली मजबुरी आहे तूझी.

की हे सगळे करण्यासाठी तुला रोकतेय.

प्लीज .. मलाही सांगशील.

माझ्या मनावर ओझं असणार नाही.

गिल्ट असणार नाही.

प्लीज..

मला सांग ते कारण ..

त्यानंतर मी कधीच तुला अडथळा करणार नाही.

शेवटी तुझ्या आनंदात माझा आनंद असणार आहे. " रागिनी 

---------

" थँक्यू सो मच ,रागिनी.

तू मला समजून घेतलेस.

माझ्या बाबांना प्रेमविवाहाशी सक्त नफरत आहे.

त्याच्या मागेही कारण आहे.

माझे आजोबा बाबासाहेब भोसले.

आमच्या गावातील एक नावाजलेले व्यक्तिमत्व.

प्रगतीशील शेतकरी म्हणून त्यांचा संपूर्ण तालुक्यात वचक होता. 

शेतीसोबत पोल्ट्रीफार्म , 

आणि इतर अनेक लघुउदयोगात देखील ते अग्रेसर होते. 

कित्येक होतकरू तरुणांना त्यांनी स्वतःचे व्यवसाय सुरु करून देण्यास मदत केली होती.

केळीपासून स्वादिष्ट पदार्थ , 

केळीच्या खोडापासून खत निर्मिती , 

खोडापासून धागे निर्मिती , 

दुग्धव्यवसाय , 

क्रीम सेपरेटर आणि पाश्चरायझेशन , 

कोंबडखत निर्मिती 

असे अनेक शेती पूरक लघुउद्योग उभारून ,

त्यांनी गावातील कितीतरी लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला होता. 

त्यांचा हा लघुउद्योगांचा सगळा व्याप माझे बाबा म्हणजे चंद्रकांत भोसले पाहत होते. 

वरून कणखर असणारे माझे आजोबा मनाने मात्र दिलदार असं व्यक्तिमत्व होतं.

माझे बाबा , सरला आणि कमळा अशी तीनच भावंडे होती.

त्यातली धाकटी आत्या कमळा तर सगळ्यांचीच खूप लाडकी.

माझे बाबा आणि सरला आत्याचे लग्न लवकर झाले.

दोघांचीही सोयरीक आजोबांनीच जुळवून आणली होती.

त्यानंतर धाकटी आत्या म्हणजेच कमळा आत्यासाठी वरसंशोधन सुरु झाले.

तिचे मात्र गावातील एक होतकरू तरुणावर अर्थातच राजेशवरती प्रेम होते.

तिच्या या प्रेमप्रकरणाची कुजबुज माझ्या बाबांना लागली.

आणि त्यांनी आजोबांना याविषयी सगळे काही सांगितले.

कमळा आत्याला याबाबतीत प्रश्न विचारल्यावर तिने हे सगळे खरं असल्याचे सांगितले.

आजोबांना हे अजिबात सहन झाले नाही.

कितीही झालं तरी हा त्यांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न होता.

त्यांनी कमळा आत्याला राजेशला विसरून जाण्यास सांगितले.

पण तिने मात्र ते मान्य केले नाही.

आजोबांनी राजेशला देखील साम-दाम-दंडभेद या उक्ती प्रमाणे सांगून पाहीले.

पण त्याने देखील आजोबांचे ऐकून माघार घेतली नाही.

शेवटी आजोबांनी कमळा आत्याला घरात नजरकैद केले.

त्यांनी तिची सोयरीक जवळच्याच गावातील अभिमन गायकरांच्या मुलासोबत ठरवली.

मुलाचे नाव होते नागेश गायकर.

नागेश श्रीमंत बापाचा मुलगा असल्यामुळे त्याला अनेक वाईट सवयी होत्या.

दारू , सट्टा सोबत त्याला बाईचे देखील व्यसन होते.

अनेक मुलींची आयुष्यं त्याने खराब केली होती.

कमळा आत्याच्या कितीतरी मैत्रिणींचे आयुष्य त्याने खराब केले होते.

पण पैश्यांच्या जोरावर सगळ्या गोष्टी दाबल्या गेल्या होत्या.

त्याची नजर खरंतर कमळा आत्यावर होती.

पण कमळा आत्याने त्याला कधीच भाव दिला नव्हता.

म्हणूनच तिचा गर्वहरण करायचे म्हणून नागेशने त्याच्या वडिलांना सांगून तिला मागणी घातली होती.

माझ्या आजोबांना यातले काहीच माहित नव्हते.

इतकी मोठी सोयरीक स्वतःहून चालून आली.

म्हणून माझे आजोबा खूप खुश होते.

त्यांनी कमळा आत्याच्या इच्छेविरुद्ध तिचे लग्न नागेशसोबत ठरवले.

पण कमळा आत्याला मात्र हे लग्न मान्य नव्हते.

जसे जसे लग्नाचे दिवस जवळ येऊ लागले. 

तसे कमळा आत्याची घालमेल वाढली.

त्यावेळी आमच्या घरी मदतनीस म्हणून एक आजी होत्या सखूआजी.

माझी आजी लवकर देवाघरी गेल्यामुळे..

लहानपणापासून सखूआजीनेच

माझे बाबा , 

सरला 

आणि कमळा आत्याला मोठे केले होते.

सखूआजीला नागेशबाबतीत सगळे काही माहित होते.

नागेशसोबत लग्न झाले तर कमळाचे आयुष्य नरकापेक्षा जास्त खराब होईल.

याची तिला जाणीव होती.

कमळा आत्याचे खरं सुख राजेश आहे.

हे ती जाणून होती.

वडिलांच्या प्रतिष्ठेचा नादात मुलीचे आयुष्य खराब होऊ नये.

म्हणून तिने कमळा आत्याला पळून जायला सांगितले.

या संकटातून सुटण्याचा दुसरा कुठलाच मार्ग नव्हता.

आजोबांनी ही सोयरीक मोडली तर अभिमन गायकरांनी त्यांना उध्वस्त केले असते.

सखूआजीने मोठ्या शिथापीने राजेशपर्यंत निरोप पाठवला.

राजेश देखील त्यासाठी तयार झाला.

आणि सखूआजीच्या मदतीने कमळा आत्या लग्नाच्या आदल्या दिवशी घरातून पळून गेली.

मुलगी पळून गेली म्हणून बाबासाहेब भोसलेंची सगळ्या गावभर छी-थू झाली.

त्यांना त्यांचा हा अपमान सहन झाला नाही.

त्यानंतर काही दिवसातच आजोबांचा हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाला.

माझे बाबा पूर्णपणे पोरके झाले.

आजोबांच्या मृत्यूला बाबांनी कमळा आत्याला जबाबदार धरले.

गावात झालेल्या बदनामीमुळे माझ्या बाबांचं देखील तिथे राहणं कठीण झालं.

त्यांनी तिथे असलेल्या मालमत्तेला विकून टाकले.

मुंबईमध्ये बिझिनेस सुरु केला.

आणि आम्ही मुंबई मध्ये स्थायिक झालो.

गावाशी संबंध तुटला ..

तोही कायमचाच..! "

" पण बाबा आजही आमच्या गावाला ,

तिथल्या आठवणींना खूप मिस करतात.

गावाकडची माती त्यांना आजही खूप ओढ लावते.

गावाकडच्या आठवणींमध्ये 

एक अनामिक जादू आहे...! 

आणि ती आजही बाबांच्या डोळ्यात स्पष्ट दिसते.

-------

कमळा आत्या राजेशकाका सोबत मुंबईमध्येच राहते.

पण बाबांनी तिच्यासोबत कुठलेच संबंध ठेवले नाही.

एक दिवस राखी पौर्णिमेनिमित्त ती आमच्या घरी आली.

पण तिला पाहून बाबांचा संताप अनावर झाला.

त्यांचा ब्लड प्रेशर हाय झाला.

त्यामुळे त्यांना हॉस्पिटलाईज्ड करावं लागले.

डॉक्टरांनी सांगितले..

की बाबांना मानसिक धक्का बसला आहे.

त्यामुळे त्यांना कुठलाही मानसिक ताण देऊ नका.

त्यानंतर काही दिवसांनी बाबांच्या छातीत खूप दुखायला लागले.

लवकर टेस्ट केल्यावर हृदयाच्या व्हेन्स मध्ये ब्लॉकेज आहे असे समजलं.

लगेचच त्यांची अँजिओप्लास्टी करून घेतली.

बायपास करण्याची वेळ आली नाही. 

ही देवाचीच कृपा म्हणावी. 

तेव्हापासून आम्ही त्यांना जरा जास्तच जपू लागलो." 

-------

" त्यानंतर मात्र एकदा मॉल मध्ये मला एकट्याला कमळा आत्या भेटली.

मी तिला बघून तिच्याशी न बोलता पुढे निघून गेलो.

तिने मला अडवले.

बाबांच्या तब्येतीची चौकशी केली.

आई , तन्वी सगळ्यांचा निरोप विचारला.

खूप उत्साह होता तिच्या बोलण्यात ,

तिच्या डोळ्यात ,

आमचा निरोप विचारतांना ....

तिच्याबाबतीत घडलेला सगळा प्रकार तिने मला सांगितला.

तिने तिचीही बाजू मांडली माझ्यासमोर.

त्यातल्या बऱ्याच गोष्टी मलाही पटल्या.

पण मी मात्र यात कमळा आत्याची काहीच मदत करू शकलो नाही.

पण बाबा तिच्याशी बोलत नाही म्हणून ती खूप दुःखी होती.

बाबांना त्रास होईल असे कधीच वागू नको.

मी जी चूक केली. 

ती चूक तू करू नकोस.

माझ्यामुळे खूप खचला आहे दादा ...

पण प्लीज त्याची काळजी घे.

असे सारखं मला विनवत होती." 

-------

" तिचे म्हणणं मला पटलं, रागिणी ....


आता पुन्हा एक धक्का माझे बाबा सहन करू शकणार नाही.

आणि लव्हमॅरेज करून मला पुन्हा त्यांना दुखवायचे नाही.

मला त्यांना गमवायचे नाही.

म्हणूनच माझे तुझ्यावर खूप प्रेम असतांनाही तुला स्वीकारू शकत नाही.

आय एम रिअली व्हेरी सॉरी रागिणी...

आय एम सॉरी ...." 

हे बोलून अनुराजच्या अश्रूंचा बांध फुटला.

त्याने डोळ्यातील अश्रूंना वाट करून दिली.

------------

अनुराज समोरची विवंचना रागिणीला समजत होती.

त्यामुळे अनुराजसाठी तिने परिस्थितीला स्वीकारायचे ठरवलं.

अनुराजसाठी स्वतःचे प्रेम विसरावे लागले तरी हरकत नाही. 

असं तिने मनाशी ठरवलं.

कारण अनुराजला त्याच्या घरच्यांपासून दूर करून ,

त्यांला दुःख देऊन तिला सुखी व्हायचे नव्हते.

खरं प्रेम म्हणजे फक्त मिळवणं नसतं ...

काही वेळा याच प्रेमासाठी त्यागही करावा लागतो. 

हे ती जाणून होती.

--------

ती अनुराजला शांत करत समजावणीच्या स्वरात म्हणाली.

" अनुराज , 

तू या सगळ्यात स्वतःला अपराधी समजु नकोस.

तुझ्या बाबांच्या आयुष्यापेक्षा , 

त्यांच्या आनंदापेक्षा ..

आपल्याला आपले प्रेम महत्वाचे नाही.

इतके स्वार्थी नाही होऊ शकत आपण..

एकमेकांचे जोडीदार होऊ शकलो नाही.

म्हणून काय झालं ..? 

पण एकमेकांचे चांगले मित्र आपण नेहमीच आहोत.

आणि आयुष्यभर असणार आहोत.

त्यामुळे चल...

स्माईल कर पाहू ...

लव्ह कपल म्हणून नाही तर 

ऍटलीस्ट मित्रमैत्रीण म्हणून तर आजची डेट आपण एन्जॉय करू शकतोच ना ....? 

माझी इतकी तयारी केलेली वाया नको जायला ना ...

डोळ्यांतले अश्रू लपवत तिने आपल्या ओठांवर स्माईल आणली.

अनुराजच्या नजरेतून सुटले नाही ते ..!

त्यालाही खूप अपराधी वाटत होते.

त्याच्या निर्णयात रागिनीने त्याला समजून घेतले.

म्हणून तिच्याविषयी त्याच्या मनात आदर वाढला होता. 

ज्या क्षणांची त्याने रोज स्वप्न सजवली होती.

ती आज प्रत्यक्षात उतरली होती.

पण तरीही तो ते क्षण जगू शकला नाही.

आयुष्य त्रास देणारी खंत होती ती ...! 

.

.

.

.

एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले जीव त्यांच्या स्वप्नांच्या किनाऱ्यावर येऊ पाहत होते.

पण किनाऱ्यावर पोहोचण्या आधीच एक वादळ त्यांच्या आयुष्यात येईल याची दोघांनाही कल्पना नव्हती.

रागिणी आणि अनुराज एकमेकांच्या आयुष्यात जोडीदार म्हणून येतील की नाही...?

की नियतीला वेगळेच मान्य आहे.

विधात्याने काय लिहून ठेवलयं रागिणी  आणि अनुराजच्या आयुष्यात ...?

सोबत की विरह ....? 

वाचू पुढच्या भागात 

.

.

.

.

क्रमशः 

प्रत्येक भाग आम्ही रोजच्या रोज तुमच्या पर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करतोय. पण पोस्ट अप्रुवलला वेळ लागतो.  सकाळी सर्वात आधी तुम्हाला आमच्या "वेलवेट कविशा" फेसबुक पेज वर ही कथा वाचता येईल. वाटल्यास तुम्ही पेज लाईक आणि फॉलो करु शकता. 🙏💞

सदर कथेबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कळवायला विसरू नका. तुमचे अभिप्राय नवनवीन लेखनाचे बळ देतात त्यामुळे तुमचे अभिप्राय माझ्यासाठी मौल्यवान आहेत.

धन्यवाद!🙏

सदर कथेच्या लेखनाचे आणि प्रकाशनाचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहे. साहित्यचोरी हा कायद्याने गुन्हा असल्यामुळे कथा शेयर करायची झाल्यास लेखिकेच्या नावासहीतच शेयर करा अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 


फोटो साभार - Google  


✍©️ जया पाटील

Post a Comment

0 Comments