घास..भाग 2

घास..भाग 2 

©️®️नियती जगताप 

नवरात्र सुरू झाली तोपर्यंत सर्व ठिक होत, 

पण दसर्यानंतर जशी देवी झोपली तसं अंगारा पण काम करेनासा झाला.  

आता सुनिल अनिल ला सारखाच त्रास होऊ लागला.  

शांता ला पण काही सुचत न्हवतं, 

अंगारा लावल्यावर थोडा वेळ बर वाटायचं 

आणि परत दोघंही भाऊ जमीनीवर लोळत विव्हळत पडायचे, 

कधी जोरात ओरडायचे तर कधी मोठ्याने रडायचे.  

असेच दोन दिवस गेले, 

तिसर्या दिवशी पहाटे सुनिल आणि अनिल खूप जास्त त्रास झाल्यामुळे बेशुद्ध पडले होते. 

शांता चा पण नुकताच डोळा लागला होता तेवढ्यात तिला जोरात आवाज आला.

"अल्लाह रेहम, दरवाजा खोल बेटी". 

शांता खडबडून जागी झाली तसेच सुनिल अनिल ही परत जोरात ओरडू लागले. 

" कोणीबी या, माझा घास मी सोडायची न्हाय, 

ह्यांच्यामुळं म्या उपाशी हाय, 

ह्ये बी उपाशीच जानार, 

म्या पोहचवनार यांना" 

जोरदार किंकाळी फोडून दोघं पण परत बेशुद्ध झाले.  

शांता ने लगबगीने दरवाजा खोलला.

एक साठ पासष्ठ वर्षाचा फकीर दारात उभा होता. 

दरवाजा खोलताच तो शांता ला म्हणाला 

"बेटी, क्या अल्लाह, 

क्या भगवान दोनो एक ही रूहानी ताकद एक ही सच के दो नाम.  

अपने बच्चों पर मुसिबत आए तो वो किसी ना किसी को भेजता ही है. 

मला परवरदिगार ने सुनिल अनिल ला,

या मुसिबत मधून सुखरूप बाहेर काढण्याचा आदेश दिला आहे.

" शांता दचकली.  

दसर्यापासून सुनिल अनिल ला पुन्हा त्रास सुरू झाला हे तिने कोणालाच कळू दिलं न्हवतं. 

घरात गर्दी बघून ते जास्त ओरडत विव्हळत होते 

आणि येणारे जाणारे लोकं पण नकारात्मकच बोलत असत. 

त्यामुळे तिने दोघंही देवीचं व्रत करत आहेत 

आणि कोजागिरी पौर्णिमेनंतरच घराबाहेर पडू शकतात असंच सगळ्यांना सांगितलं होतं.  

तिच्या चेहर्यावरचे हावभाव टिपून तो फकीर पुन्हा बोलू लागला " 

बेटी, तुला पडलेला प्रश्न मी समजू शकतो. 

मी बम्बई च्या हजरत पीर सैय्यद अली मिरा दातार दर्ग्यामध्ये खुदा ची इबादत करतो.  

काल मी मग़रीब ची नमाज अदा करत होतो तेव्हा अल्लाह ताला चा हुक्म झाला, 

त्यांनीच मला दाखवलं की सुनिल,अनिल कसे या अतृप्त आत्म्याचा शिकार झाले. 

नुकतीच जवानीत आलेली पोरं, 

गलती करून बसले.  

त्यांना त्याची सजा पण मिळाली, 

आता त्या आत्म्याला यांना सोडावचं लागल नाहीतर ,

त्या आत्म्यावर खुदा चा कहर बरसेल." 

एवढं ऐकून शांता चाही त्या फकीर बाबा वर विश्वास बसला.  

तिने त्यांना घरात घेतलं. 

त्यांनी घरात पाऊल टाकल्याबरोबर सुनिल अनिल जागे झाले. 

विभित्स हसत दोघे आधाश्यासारखे बाबाच्या जवळ येऊ लागले.

 त्यांनी झोळीतून एक बाटली काढली 

आणि लगेच त्यातलं पाणी दोघांच्या अंगावर शिंपडलं ,

तसं त्या दोघांच्या अंगातून ठिणग्या बाहेर पडल्या ,

ते बेशुद्ध व्हायला लागले.  

तसा तो फकीर परत जोरात ओरडायला 

" खबरदार, पळण्याची कोशिश जरी केली. 

इतने दिन यांना सोडत न्हवतीस 

तर आता पण मी बोलेल तोपर्यंत इथंच थांबायच". 

त्यांनी झोळीतून परत काही पिशव्या काढल्या 

आणि शांता कडे दिल्या.

 "बेटी, याच्यात जरूरत चं सगळ सामान आहे. 

एका तासात हे नीट बनवून आण 

आणि आत्ता पासून ते मी बोलवेल तोपर्यंत तूझ्या देवीच्या नावाचा जप करत रहा.  

ती तुला काही तकलीफ नाही होऊ देनार." 

शांता निघून गेली 

आणि सुनिल अनिल जोरजोरात फकीर बाबा ला शिव्या देऊ लागले.

 "म्या इतक्या सहजासहजी या दोघांना सोडायची न्हाय, 

म्या नाही जानार." 

फकीर बाबा ने झोळीतून त्यांचा सर्व साहित्य काढलं.  

लोभन जाळून पूर्ण घरभर ते फिरवलं ,

तसं दोघं जण फकीर बाबाला मारायला त्याच्यावर धावून गेले,

फकीर बाबा ने पुन्हा दोघांवर सिद्ध पाणी शिंपडलं , 

तसे सुनिल आणि अनिल फरशीवर लोळून जोरजोरात रडायला लागले.  

फकीर बाबा ने त्या आत्म्याला समोर येऊन बसायला लावलं. 

पहिल्यांदा दोघांनी घराबाहेर पळण्याचा प्रयत्न केला ,

पण लोभनाच्या धुराने त्यांच्या भोवती मजबूत रिंगण बनवले ,

जे  तोडणं त्या आत्म्याला जमत न्हवतं, 

ना फकीर बाबाला रोकता येत होतं , 

म्हणूनच त्या आत्म्याने आता शांताचा वापर करून घरातून पळ काढायचा प्रयत्न केला,

पण शांता देवीच्या नावाचा जप करत होती त्यामुळे त्या आत्म्याला शांता च्या जवळ पण जाता येत न्हवतं.  

आता सुटका नाही हे समजल्यावर तो आत्मा सुनिल आणि अनिल च्या शरीरातून, 

काळ्या धुराच्या रूपात बाहेर आला 

आणि फकीर बाबाच्या समोर बसला. 

फकीर बाबा ने शांताला बोलवलं, 

देवीचा अंगारा दोघांना लावायला सांगितला  

आणि स्वतःजवळचं पाणी त्यांच्या तोंडावर शिंपडलं,

तसे दोघं जण शुद्धीवर आले. 

आता फकीर बाबा ने आपला मोरपीसांचा झाडू उचलला, 

पुन्हा लोभनाचा धूर केला 

आणि आत्म्याला विचारलं  

" बता, कोन आहेस तू आणि तूला काय पाहिजे?" 

त्या धुरातून आवाज येऊ लागला 

" म्या बयोअक्का, 

हे गाव माझं सासर हाय. 

लग्न होउन इथं आले 

अन माझ्या नवर्यानं अन सासरकडच्यांनी माझं माहेर मला तोडलं.  

जशी लग्न करून आले ,

त्या दिसापासून मला घरातून बाह्यर न्हाय पडू दिली. 

माझं धनी माझ्याशी चांगलं वागायचं 

पर माझी सासू मला लय तरास करायची. 

सासरे बी त्यांच्या पुड कईबी बोलू शकत न्हवते.  

लग्नाला पाच वरीस झालं पण पाळणा काय हालीत न्हवता 

मंग माझ्या सासूनं माझ्या धन्याचं कान भरलं 

आणि माझ्या धन्यानं माझ्यासाठी सवत आन्ली.  

तिची कुस एका वरिसात उजवली, 

देवींनं वंशाचा दिवा पाठिवला व्हता. 

त्यो जल्माला आला 

आणि माझं आणि हाल सुरू झालं. 

धन्यासकट समद्यांना मी नकूशी झाले.  

एक दिस संमद्यांनी मला लय हाणलं, 

पार मरस्तोपरंत मारलं अन मंग मला एका खोलीत टाकलं 

आणि बाह्यरनं मोठालं टाळं ठोकलं. 

मला अन्नाचा एक कण दिला न्हाय का घ्वाटभर पानी दिलं न्हाय.  

चार पाच दिस म्या कशीतरी जगली 

आणि मंग म्या जीव सोडला. 

पर त्या लोकांना धडा शिकवाया म्या परत आली.  

त्यांना त्रास द्यायला लागली. 

संमद्यांचा नायनाट केला पर ते पोरं मोठं श्यान निघालं.  

तीस वरीसाचं झालं ते पोर, 

त्याच्या आयला म्या त्याच्या डोळयासमोर मारली, 

तसं ते पोर पळून गेलं अन थोड्या दिसानी तूज्यासारख्याच एका फकीर बाबास्नी घेऊन आलं.  

त्यानं मला तिथून जायला भाग पाडलं. 

उपाशी मेली म्हणून मटणाच्या जेवणाचा वायदा केला. 

इतक्या वरिसानं खाया मिळणार म्हणून म्या बी लय खुशीत व्हते,

 पर या पोरांनी माझ्या त्वांडचा घास पळिवला.  

लय तरास काढला म्या, 

माझं कुंकू जित्ता असताना पन इधवेवानी दिस काढले. 

लय अप्मान सहन केला बघा. 

उपास सहन केले, 

अन या भ**यांनी माझं शेवटालं जेवण बी गिळलं"  

आणि तो आत्मा जोरात रडू लागला. 

फकीर बाबा आता बोलू लागले, 

"बयोअक्का, तू जी तकलीफ सहन केली, 

अपमान सहन केला त्या सगळ्याची परतफेड ,

खुदा तूझ्या पुढच्या जन्मात करलं.  

जेवढं या जन्मात सहन केलं तेवढंच सुख तूला पुढच्या जन्मात मिळणार आहे. 

अल्लाह ने तूझी किस्मत लिहून ठेवली आहे, 

तूला फक्त या जन्मातून आजाद व्हायचं आहे.  

जाताना तूझा मान पण तूला मिळलं, 

जिथं तो तूला मिळाला होता 

पण या दोघांच्या नादानीमुळं तो तुझ्यापर्यंत पोहोचला नाही 

तिथंच तूला मिळल.  

तो कबूल कर आणि आझाद हो". 

ठिक आहे बोलून तो काळा धूर तिथून गायब झाला. 

हे सगळं होईपर्यंत संध्याकाळ झाली होती.  

फकीर बाबांनी सकाळी शांताला पिशवीतून मटण आणि मसाला दिला होता. 

शांता ने सगळं जेवण बनवलं होतं.  

फकीर बाबांनी ते सगळं जेवण सुनिलला एका केळीच्या पानावर वाढायला लावलं. 

अनिलला बाजारातून एक हिरवी साडी, 


ओटी, हिरव्या बांगड्या, 

कुंकवाची डब्बी आणि गजरे आणायला सांगितले.  

सगळं सामान आणल्यावर एका ताटात केळीच्या पानावर वाढलेलं जेवण 

आणि एका ताटात साडी,

ओटी आणि बाकीचं सगळं सामान घेऊन सर्व त्या नदीकाठी आले.

तिथे बायअक्काची माफी मागून फकीर बाबांनी दोघांना दोन्ही ताटं पाण्यात सोडायला सांगितली. 

फकीर बाबांच्या सांगण्यावरून मागे वळून न बघता सर्वजण घराकडे परतले.  

इकडे दोन्ही ताटं पाण्यावर तरंगत नदीच्या मध्यभागी गेली 

आणि अचानक कोणीतरी ओढावं,

अशा पद्धतीने ती दोन्ही ताटं पाण्यात बुडाली.

**** समाप्त ****

©️®️नियती जगताप

घास..भाग एक आणि दोन ही कथा लेखिका नियती जगताप यांची असून सदर कथेचे हक्क लेखिकेकडे राखीव आहेत. आम्ही त्यांच्या पुर्व परवानगीने ही कथा आमच्या वाचकांसाठी वेबसाईटवर उपलब्ध करून देत आहोत. सदर कथेवर आमचा कोणताही हक्क नाही.

धन्यवाद..

सदर कथेच्या लेखनाचे आणि प्रकाशनाचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहे. साहित्यचोरी हा कायद्याने गुन्हा असल्यामुळे कथा शेयर करायची झाल्यास लेखिकेच्या नावासहीतच शेयर करा अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल.


 Velvet Kavisha





Post a Comment

0 Comments