सर्मपण
भारती देव
"काय सांगते गायत्री !?तुझे बाबा तयार झाले!सहलीला पाठवायला?"
"हो,सरीता माझी तयारी सुध्दा झाली"
"उद्या सरळ बसमध्येच भेटू मग. वेळेवर या सगळ्यांनी."
गायत्रीच्या महाविद्यालयाची शैक्षणिक सहल पुण्याला निघाली होती. रसायनशास्त्र विभागातले विद्यार्थी, विद्यार्थिनी, प्राध्यापक एकत्र आल्याने उत्साह ओसंडून वाहत होता.ती पहिल्यांदाच एकटी घराबाहेर अशी सहलीला चालली होती. तिच्या वर्गानेही काही प्रयोग दाखवायचे ठरवले होते. ती सहभागी असल्याने तिने बरीच तयारी केली होती. शेवटच्या वर्षाला असणाऱ्या विद्यार्थ्यांना या सगळ्याचा खूप फायदा होणार होता.
तिथे वेगवेगळ्या शहरातून विद्यार्थी आले होते. नियोजित सगळं सुरळीत चाललेलं होतं. गायत्रीच्या वर्गाचा प्रयोग अतिशय आकर्षक पद्धतीने तिने सर्वासमोर ठेवला होता.
दुपारच्या जेवणासाठी हाॅलमध्ये गर्दी झाली होती.उपस्थिताच्या मानाने जेवणचा हॉल अगदीच छोटा होता. वर सुर्य आग ओतत होता.उकाडा त्यात गर्दी. गायत्रीला सकाळपासून पाणी पिण्याचं ही भान नव्हतं. त्यामुळे थोडसं अस्वस्थ वाटत होत.तिने पाण्याचा ग्लास तोंडाला लावला.तेवढ्यात हॉलला लागूनच असलेल्या स्वयंपाक घराच्या दिशेने आगीचा लोळ तिला येताना दिसला. सगळीकडे एकच पळापळ सुरू झाली.
जो तो स्वतःला आगीपासून वाचविण्यासाठी बाहेर निघू पाहत होता. प्रा.वसंत सर्वांना मदत करत होते.बाहेरच्या बाजूला जाणाऱ्या दरवाजाच्याच्या तिथे अग्निरोधक सिलेंडर होत.तिथपर्यत जाण्यासाठी ते धडपडत होते. गर्दीत फसलेल्या विद्यार्थ्यांना बाहेर काढताना तेच अडकत होते.
आग,धुर,उकाडा, किंकाळ्या गायत्रीला काही सुचतच नव्हतं.त्यातच तिच डोकं गरगरायला लागंल.चेगराचेंगरीतून ती पुढे सरकत होती.आता तिला पुढे जाताच येत नव्हत. कारण डोळ्यांसमोर काजव्यांसारखं काहीतरी चमकत होतं. डोळे बंद ठेवणे हा एकच उपाय होता त्याच्यावर. वसंताने अग्निरोधकाचा फवारा मारला. बरेच विद्यार्थी त्यामुळे बाहेर पडत होते. गायत्री मात्र पुढे सरकतच नव्हती.तिच्यामुळे इतरांनाही पुढे येता येत नव्हतं. वसंताने गायत्रीला पुढे येण्यासाठी हात दिला. त्याचवेळी नेमकं गर्दीच्या धक्क्याने ती जास्तच पुढे ढकलली गेली. तिच डोकं त्यांच्या छातीवर आपटलं.तिनं आधारासाठी त्याचा मजबूत खांदा घट्ट पकडला. इतरांना जाण्यासाठी वाट मिळावी या हेतूनं त्यांने तिला अजूनच जवळ ओढून घेतल.
गायत्रीच्या डोळ्यापुढे अजूनही अंधारी येत होती. तिने घाबरून वसंताला गच्च मिठी मारली. त्यातून वाऱ्याला ही जायला जागा नव्हती.त्याच्या हद्याची धडधड तिला ऐकायला येत होती.वसंतालाही तिचे उष्ण श्वास आणि भीतीने धपापणाऱ्या छातीची थरथर जाणवत होती.तिचे ओठ त्यांच्या गळ्यापाशी किंचित स्पर्शत होते.तिच्या रेशमी केसातला गंध नाकात शिरत होता.तो त्या मिठी मुळे पुरता जायबंदी झाला होता.क्षणातच भानावर येत त्याने आवाज दिला.
"अहो मिस,...आपल्याला बाहेर पडावं लागेल."
तिचा काहीही प्रतिसाद आला नाही.त्याने तिची हनुवटी वर उचलून बघितल. तिच्या गुलाबी पापण्या बंद होत्या. तिने ओठ आवळून धरले होते.त्यामुळे ते जास्त लाल दिसत होते.तिच्या गोऱ्यापान चेहऱ्यावर कानाजवळ तीळ शोभून दिसत होता.रेखीव भुवया नाकाच्यावर मधोमध जोडल्या गेल्या होत्या.तिथेच लहानशी केशरी टिकली तिला मोहक बनवत होती.
"मिस,अहो, बाहेर पडायचंय आपलयाला "
????
वसंताने एक दोन सहकाऱ्यांना मदतीसाठी आवाज दिला.दोन-तीन विद्यार्थी, प्राध्यापक धावतच आले.
"सर काय झालं,?"
"हिला बाहेर काढायला मदत करा.ही बेशुद्ध झालीय बहुतेक,"
गायत्रीला सगळ्यांनी मिळून कसंतरी बाहेर, सुरक्षित ठिकाणी हलवलं.
तिचे शिक्षक तिलाच शोधत होते.
"काय झालं हिला..?"
"काही समजलं नाही सर,गर्दीत एकदम घाबरून.."
वसंत एकदम बोलायचा थांबला.त्याच्या एका आगाऊ विद्यार्थ्यांने माहिती पुरवली.
"सराना येऊन बिलगली.अजूनही डोळे बंदच आहेत."
वसंताने तिला तिच्या मैत्रिणीकडे सोपवलं.
"गायत्री अग डोळे उघड. आगीतून बाहेर आलोय आपण."
वसंताने तिच्या डोळ्यांवर पाणी शिंपडलं.
"नको,नको चक्कर येते डोळे उघडल्यावर"
तिने प्रा वसंताचा हात घट्ट पकडला.
"काही होणार नाही,उघडा डोळे"
तिने डोळे उघडले.आपण कोणातरी तरुणांचा हात पकडला आहे यांची जाणीव होताच तिने तो पटकन सोडून दिला.
धन्यवाद,सर"
"आता ठीक आहात ना?"
"अ....हो"
"मी प्रा.वसंत..."
"हो आल्यापासून बघते आहे आपली धावपळ.पुन्हा एकदा thank you. मला समजलंच नाही तेव्हा काय झाले ते"
"चला चला सगळ्यांनी निघा. मुक्कामाच्या ठिकाणी
पोहोचायला बराच उशीर झालेला आहे."
काही घडलंच नाही ह्या अविर्भावात सगळे पुन्हा बस मध्ये येऊन बसले. गायत्री, सरिता आणि प्रा. वसंत नेमके मागेच राहिले. त्यामुळे दोघही एकमेकांसमोर आले.
दोघही एकमेकाच्या डोळ्यांत बघत होते. गायत्रीला खूपच लाजल्यसारख वाटत होतं. वसंताला तिचा तो स्पर्श,गंध, निरागसपणे मारलेली मिठी सगळं आठवत होतं. त्याने त्यांच्या मनात ते साठवून घेतलं. तो पुन्हापुन्हा तिलाच निरखत होता.ती मात्र नजर चोरत होती. आपल्याकडुन हे काय घडलं?याची बोचणी लागली तिला.सरीता सगळं बघत होती.
"गायत्री प्रा. वसंत तुझ्याकडेच बघतात सारखे"
"हो,ना मघाशी चुकुन घडलं सगळं त्यामुळे असेल बहुतेक"
"काय घडलं?"
"जाऊ दे, सांगते नंतर, चांगलं खडसावून काढावसं वाटतंय त्यांना"
"मग वाट कोणाची बघते?"
त्या दोघींची कुजबुज सुरू होती.बसमध्ये त्यावेळेच सुपरहिट गाणं 'ये वादा रहा सनम' वाजायला लागलं आणि गायत्रीने डोळे बंद करून घेतले.
या सगळ्या धावपळीत कोणाचही जेवण नीट झालेलं नव्हतं. त्यामुळे पोट पूजेसाठी बस थांबली.
तिथे बराच वेळ जाणार असं वाटतं होत.गायत्रीला झालेला प्रसंग पुन्हा पुन्हा आठवत होता.डोळ्यापुढे चक्कर आली काय?आपण सराना मिठी मारली काय?किती मुर्खासारखे वागलो आपण.त्याच्या हद्याची धडधड तिला आठवत होती.
"मिस गायत्री"..
तिची तद्री भंगली. समोर प्रा.वसंत उभे होते.
"सर तुम्ही इकडे,?"
खरं तर मघाशी त्यांच्या सारख बघण्याचा तिला राग आला होता.
"पुन्हा काही त्रास होतोय का ?"
"नाही सर आता काही त्रास नाही. तेव्हा तुम्ही नसतात तर मी खालीच कोसळली असती. Thank you. पण म्हणून तुम्ही माझ्याकडे सारखं बघत बसू नका."
"मी कुठे सारखा बघतोय तुम्हाला भास होत असेल, असा त्रास नेहमी होतो तुम्हाला?"
"नाही पहिल्यांदाच झाला,सकाळपासून काही खाल्लं नसल्याने."
"माझ्याही आयुष्यात पहिल्यांदाच घडली अशी घटना"
"हो,ना कशी काय आग लागली?"
"आगी बद्दल नाही बोलत मी गायत्री. आपल्या भेटीबद्दल बोलतोय, तुझ्या त्या स्पर्शातली जादू, आधारासाठी मारलेली घट्ट मिठी.'क्षण एक पुरे प्रेमाचा' मी प्रेमात पडलो. प्रयोगाचं प्रेझेंटेशनही खूप छान होतं तुमच."
"सर नाही तस काही नाही. खरंतर बाहेर पडण्यासाठी.....
तिला पुढे काय बोलावं तेच सुचत नव्हतं हसावं की रडावं. एक नाकारता न येणार सत्य स्वीकारावं की स्वीकारू नये. प्राध्यापक वसंता तिच्या खूपच जवळ येऊन उभे राहिले होते. त्यामुळे हृदय वेगानं धडधडू लागलं. त्यांच्या डोळ्यात आपण हरवून तर जाणार नाही ना असं वाटायला लागलं. तरी तोल सावरत ती म्हणाली,
"सर तो एक अपघात म्हणून आपण विसरून जाऊया, म्हणजे एक घटना"
"बघ ना गायत्री अपघातही इतके सुंदर असतात, मला वाटतं हा अपघात नियतीने आपल्या भेटीसाठी आधीच लिहिलेला असावा. आपण भेटायला हवं यापुढे."
"नाही सर तसं काही नसावं माझ्या डोळ्यापुढे अंधारीसारख वाटल. त्याचवेळी नेमके तुम्ही तिथे होतात "
"बघ ना किती घट्ट पकडला होता तु माझा हात,"
त्याच्या मनगटावर बोटं रुतलेली दिसत होती.
"आई...ग सॉरी सर रक्त साकाळल आहे तिथं"
"तू सॉरी म्हणावं म्हणून नाही तर फुंकर मारावी म्हणून दाखवलं."
"सर... खरच मलाच खूप लाजल्यासारखं होतंय आणि तुम्हाला वाटतं तसं अजिबात नाही."
"मग तसं नसतं तर मला चांगलं खडसावलं असतं तू, मी निरखून बघत होतो तेव्हा म्हणून तुला खूप राग आला होता. मग ओरडली का नाहीस माझ्यावर?
गायत्री विचारातच पडली यानि कसं कळलं आपल्या मनातलं.
"तुझ्या मनातलं मला बरोबर कळतं कारण तुझे डोळे खूप बोलके आहेत."
प्रा.वसंतने गायत्रीचा हात हातात घेऊन प्रेम विषयावर कधी बोलायला सुरुवात केली हे दोघांनाही समजलं नाही. ते बोलत होते आणि ती ऐकत होती. गायत्रीच्या मनात आलं. खरंच किती छान बोलतात असंच जीवाचे कान करून हयाला ऐकत राहावं. इतके सुंदर काव्य, इतकी छान भाषा.
"गायत्री बस निघाली तू खाल्लं नाही काहीच"
सरिताच्या वाक्याने दोघही भानावर आले.ती त्या दोघांकडे बघतच राहिली आणि तिला काय समजायचं ते समजली.
गायत्रीची शैक्षणिक सहल अशा रीतीने संपली. आणि जीवनाचा नवा अध्याय सुरू झाला. गायत्री एका मध्यमवर्गीय कुटुंबातली मुलगी. कॉलेजातही ती मुलांपासून बरीच दूर रहायची. कारण तिच्या घरातली करडी शिस्त. त्यामुळेच ती थोडीशी आत्ममग्न, नाकासमोर चालणारी, पण तितकीच धीट. ती कोणाच्या भानगडीत सहसा पडायची नाही. एकत्र कुटुंबात लहानाची मोठी झालेली असल्याने तिचे वडीलही अजून स्वतंत्र नव्हते. मोठ्या काकांचा प्रचंड धाक त्यांच्या घरात होता.
लग्नाचा विषय काढला की ती खूप चिडायची. खरंतर शेवटच्या वर्षाला असल्याने अभ्यास, प्रॅक्टिकल्स शिवाय ती संपादक मंडळातही काम करत होती. त्यादिवशी आईने तिच्यासमोर एकदम साडीच ठेवली.
"आई किती छान साडी आहे! कोणासाठी ग?"
"आवडली ना तुला, अगं तुझ्यासाठीच आणली. तुला उद्याच पाहुणे बघायला येणार आहेत"
"काय!? मला न विचारता ठरवलं तू आणि बाबांनी,? अगं माझी फायनल परीक्षा तोंडावर आली आहे. उद्यापासून प्रॅक्टिकल्स अजून खूप काम आहे कॉलेजचं.."
"गायत्री, ऐक ना. आम्हाला तरी कुठे माहिती होतं? तुझ्या मोठ्या काकांनी परस्पर ठरवलं. मुलगा सुद्धा नाही बघितला बाबांनी अजून"
"आई अग पण साडी ब्लाऊज"?
"मी सगळं केलंय तू फक्त एवढी वेळ निभावून ने पोरी आमचाही नाईलाज झाला गं"
गायत्रीने तणतणतच हो म्हटलं. तिला प्रा. वसंतांची तीव्रतेने आठवण झाली. त्यांची आठवण का यावी याचं तिलाही आश्चर्य वाटत होतं म्हणजे आपणही प्रेमात पडलो की काय?
तिने मनाशी ठरवून टाकलं. जर आपल्याला मुलगा आवडला नाही तर सरळ काकांना जाऊन, नाही म्हणून धमकावून सांगायचं.
गायत्रीची कांदेपोह्याच्या कार्यक्रमाची अजिबात इच्छा नव्हती. तिने फक्त साडी घातली. काकांच्या ऑर्डर्स पाळण सगळ्यांना क्रमप्राप्त असल्यामुळे घरात जंगी तयारी होती.
खिन्न मनाने ती आलेल्या मंडळी समोर पोह्याच्या डिश घेऊन गेली. खुर्चीत ती खाली मान घालूनच बसली होती. प्रश्न उत्तरं सुरूच होती. ती मान वर करूनही बघायलाही तयार नव्हती.
"पुढे रसायनशास्त्र विषयात काय करायला आवडेल तुम्हाला"?
प्रश्न आणि आवाज तिला खूपच ओळखीचा वाटला. तिने मान वर करून समोर बघितले तर प्रा. वसंत बसलेले होते. तिने स्वतःला दोन-तीनदा चिमटा काढून खात्री करून घेतली.ते बघण्यासाठी आले होते. त्यांच्याही डोळ्यात आश्चर्य दिसतच होतं. ते नेत्र पल्लवीतूनच गायत्रीला कशी आहेस? असं विचारत होते. प्रश्नाचं उत्तर द्यायला वेळ लागलेला बघून काकांनी मध्येच उत्तर दिलं.
"आमचं तसं काही ठरलं नाही अजून, आमची काय पुढे शिकवायची इच्छा नाही."
गायत्री थोडीच ऐकणार होती.
"मला रसायनशास्त्रामध्ये अजून पी.एच.डी पर्यंत तरी शिक्षण घेणयाची इच्छा आहे"
"नक्कीच तुझी इच्छा पूर्ण होईल"
वसंताच्या वडिलांनी तिला अर्थपूर्ण दुजोरा दिला. गायत्रीचीही कळी खुलली होती. खेळीमेळीच्या वातावरणात बैठक संपली. निघताना ती वसंताच्या कुटुंबातील वडीलधाऱ्यांच्या पायावर डोकं ठेवायला विसरली नाही.हे सगळ सरिताला समजलं तेव्हा तिने तिला चिडवलच.
"काय ग शहाणे, तू तर लग्नच करणार नव्हती ना!? मग कशी काय तयार झाली?
"सरिता सरिता काय सांगू तुला?"
अत्यानंदाने गिरकी घेणाऱ्या गायत्रीला बघून तिला आश्चर्यच वाटलं.
"अगं कोण आलं होतं बघायला माहित आहे"
"नाही.. तू सांगितल्याशिवाय कसं समजेल"
"वसंत सर आले होते"
"काय!? त्यादिवशी निरखून बघत होते. मग नंतर हातात हात काय आणि आता डायरेक्ट बघायला.?
"खरं नाही वाटत ना.. ?'
"अजिबात खरं वाटत नाही गायत्री. तुला सांगते अगं प्रेमाची वाट एवढी सोपी थोडी असते. तिच्यात संघर्षच जास्त असतो. तू किती भाग्यवान आहेस तुला सहजासहजी तुझं प्रेम मिळतं आहे. तू बोलली नाहीस पण तुझे त्याच्यावर प्रेम जडल होतं हे स्पष्ट दिसत होतं मला."
"पुढच्या आठवड्यात त्यांचे आई, वहिनी, दादा बघायला येणार आहेत मला, तू येशील तयारी करून द्यायला."
"नक्कीच येईल,.."
गायत्री हुरळून गेली होती. तिच्यातल्या बदलाचं घरातील सगळ्यांनाच आश्चर्य वाटत होतं. पण खरी गोम काय होती हे फक्त तिलाच माहित होतं.
घरात तिच्या लग्नाची उलट सुलट चर्चा सुरू होती.
गायत्रीचे मोठे काका म्हणजे कावेबाज आणि स्त्रियांना कमी लेखणारा माणूस होता. लहान भावाला गायत्री सारखी सुस्वरूप, तल्लख बुद्धीची मुलगी आहे हेच त्यांच्या बुद्धीला पटण्यासारखं नव्हतं. सगळ्या कुटुंबात गायत्रीच एकटी त्यांना न जुमानणारी, नजरेला नजर देणारी मुलगी होती.
घराला कुलदीपक पाहिजे या नादात काकांनी एकापाठोपाठ पाच मुलींना जन्माला घातलं. त्यांना गायत्री पेक्षा सुद्धा वयाने लहान दोन मुली होत्या. कधी एकदा त्यांच्या लग्नाच्या जबाबदारीतून मोकळा होतो असं त्यांना झालं होतं पण गायत्रीचे शिक्षण लांबत चाललं होतं.
गायत्रीला मुंबईकडच्या पाहुण्यांसमोर गावंढळ म्हणून कस सिद्ध करायचं याची भरपूर तयारी त्यांनी केलेली होती. या स्थळाने नापसंती दर्शवली रे दर्शवली की ताबडतोब गायत्रीला कुठल्यातरी तालुक्याच्या ठिकाणी ते लग्न लावून देणार होते. म्हणजे त्यांच्या दोन्ही मुलींच्या लग्नाचं त्यांना बघता येणार होतं. त्याच्या मते आजच्या जमान्यातही मुलींना शिक्षण देऊन काही फायदा नाही.त्याच्या मुलींनाही शिक्षणाची फारशी आवड नसल्याने लग्नाची घाई झाली होती. गायत्री मोठी असल्याने तिच्या लग्नाशिवाय लहान बहिणीचे हात पिवळे करता येणार नव्हते.
झालं उलटच. वसंताने गायत्रीला पहिल्या झटक्यातच पसंत केलं. आता काकांच्या मुलीही मुंबईचा मुलगा पाहिजे असा हट्ट धरून बसल्या. नियतीच्या मनात काय असतं हे कोणालाही ठाऊक नसतं.
एके दिवशी गायत्री कॉलेज कॅन्टीनला बसलेली असताना वसंत तिच्या समोर येऊन उभा राहीला. त्याला बघून ती केवड्यांदा तरी दचकली.
तुम्ही! ?"
" एवढं दचकायला काय झाल.कॉलेजच्या कामासाठी आलो होतो."
" तसं नाही अचानक समोर आलात म्हणून."
"अचानक कुठे तूच तर बोलावलं मला काल स्वप्नात येऊन"
"काहीतरीच काय सर?"
गायत्री आजूबाजूला आपल्याकडे बघत तर नाही ना याची खात्री करून घेत होती.
"इकडे तिकडे काय बघतेस गायत्री? इथे काय आगबीग लागणार नाही आणि लागलीच तर काय करशील"?
"काही नाही सरळ बाहेर जाईल. त्या दिवशी काही खाल्लं नव्हतं म्हणून घडलं ते सगळं"
"काही घडलं होतं.मला तर काही आठवत नाही बुवा"
"शहाणेच आहात त्यादिवशी म्हणालात ना 'क्षण एक पुरे प्रेमाचा'!"
"असं म्हणालो मी?"
"मला नाही माहित"
गायत्रीच्या डोळ्यात लाज, चेहऱ्यावर गुलाब फुलले. वसंता याच क्षणाची वाट बघत होता.
"आता आग न लागताच येशील बघ माझ्या मिठीत"
गायत्रीने डोळे मोठे करतच त्याला दटावलं
"अगं म्हणजे लग्नाच्या नंतर"
"चला प्राध्यापक महाशय घरी जायला उशीर होतोय मला. आई प्रश्न विचारेल"
"मग सांग खरं खरं"
"नाही मोठ्या काकांना कळलं तर त्यांना अजिबात आवडणार नाही माझ्यामुळे आईला बोलणी खावी लागतात."
"काय फक्त असं भेटणं, चहा, खाणं दुसरं काहीच करत नाही मी"
"करूही शकणार नाही सर. चला उशीर होतोय, मी निघते"
"चल मित्राच्या बाईकवरून सोडतो तुला"
"काकांनी किंवा अजून कोणी पाहिलं तर सगळं बिंग फुटायचं. सरिता थांबली आहे माझ्यासाठी"
"ती कधीच गेली. म्हणजे मीच जायला सांगितले तिला"
"मला न सांगता कशी गेली"?
गायत्रीने चेहऱ्यावर ओढणी बांधली आणि वसंताच्या मागे बसली.
"अजून कोणी येणार आहे का आपल्या सोबत"?
"कोण येणार?"
"मग मध्ये ही जागा कुणासाठी ठेवली आहे,पकडून बस नीट."
वसंताने पद्धतशीर ब्रेक मारल्यावर दोघातलं अंतर आपोआपच कमी झालं. गाव जसजसं जवळ यायला लागलं गायत्रीच्या छातीत धडधडू लागलं.
"सर..."
वसंताला तिने सर म्हटलेलं ऐकू येत नव्हतं.
"वसंता प्लीज, इथेच सोडा मला मी चालत जाईन"
"का घरापर्यंत येऊ शकत नाही मी तुझ्या?"
"नको ना, तुम्हाला काकांचा स्वभाव माहित नाही"
"अगं पण लग्न ठरतंय ना आपलं"
"लग्नाआधी असं भेटललं काकांना अजिबात पटणार नाही प्लीज"
"चल मग त्या गार्डनमध्ये थोडं फिरूया"
"नको ना उशीर झाला म्हणजे काकाच्या चौकश्या सुरू होतात रे वसंता"
एकेरी शब्द तोंडातून निघून गेल्याने तिने जीभ चावली.
"काय म्हणालीस म्हण ना परत एकदा"
"नाही ते अनावधानाने निघालं तोंडातून"
"काही म्हण गायत्री पण अनावधानाने होणाऱ्या सगळ्या गोष्टी छान असतात तुझ्या"
वसंताने तिच्या गळ्यात हात गुफंले.
"पुन्हा एकदा वसंता म्हण गं"
"फारच हट्टी दिसतात तुम्ही, तुमचा हेतू मला काही चांगला दिसत नाहीये"
"माझा हेतू चांगला आहे. चोराच्या मनात चांदणं. डोळे भरून बघू तर दे फक्त"
"हे गाव आहे मुंबई नाही,"
"मुंबई असती तर आत्तापर्यंत..."
"काय आत्तापर्यंत? चला हात काढा.मला घरी जायच आहे."
"गायत्री तुझं खरंच प्रेम आहे ना माझ्यावर"?
"हो अगदी पहिल्यांदा बघितलं तेव्हापासून. पुण्याच्या कार्यक्रमाचे नियोजन करताना. तेव्हाच पडले होते मी तुमच्या प्रेमात,"
"वा रे वा! मग हे सांगणार कधी?आणि त्यापुढचं सगळं,?"
"नाही तो खरच अपघात होता,कितीदा सांगू? कदाचित तुम्ही बघायला आला नसता तर कधीच सांगितलं नसतं. तुम्हीच म्हणाले त्यादिवशी. प्रेम समर्पण मागतं म्हणून "
"अजून एक सांगू. शिक्कामोर्तब झाल्याशिवाय प्रेमाला काही अर्थ नाही "
"मी तुमच्या कर्तबगारीवर, हुशारीवर, स्वभावावर प्रेम केलंय."
"म्हणूनच तर सोडवत नाहीये तुला"
वसंताने तिच्या ओठांवर ओठ टेकले.गायत्रीने त्याला जोराने चिमटा काढत स्वत:ची सुटका करून घेतली.
वसंताची आई बघण्यासाठी आली तेव्हा गायत्रीला थोडं दडपण आलं.तिच्या दोघी बहीणी सजूनधजून त्यांच्या पुढे पुढे करत होत्या.सरीताने गायत्रीला छान तयारी करुन दिली होती.गायत्रीचं सालस,पण नक्षत्रासारखं रूप वागणं, बोलणं सगळंच वसंताच्या आई बाबांना आवडल्याच त्यांनी सांगून टाकलं.मुलाची आवड हीच त्यांची आवड होती.
वसंता आईबाबाना घेण्यासाठी आला तेव्हा गायत्रीला बघतच बसला.खरतर तेव्हाच लग्नाची बोलणी करून तारीख ठरेल असं त्याला वाटलं.पण गायत्रीच्या काकांनी ती गोष्ट परस्पर बरोबर टाळली.
गायत्री आणि वसंता एकमेकाच्या स्वप्नात रममाण झाले. इकडे काकाच्या मनात वेगळाच कट शिजत होता वसंताच्या घरी 'आम्हाला मुलगा पसंत नाही आपले संबंध जुळणे अशक्य वाटते' अशी बोटभर चिठ्ठी देऊन ते स्वस्थ बसले नाहीत. मुलांकडच्याना आपली मुलगी पसंत नाही त्यांचा नकार आला असं त्यांनी पद्धतशीर रित्या घरात सगळ्यांना सांगितलं.
गायत्रीला त्या रात्री ही गोष्ट आईकडून समजली. उघड्या डोळ्यांनी बघितलेल्या स्वप्नांच्याही ठिकऱ्या ठिकऱ्या झाल्या. का केलं असेल वसंताने असं? या विचारांनी तिचं डोकं भणाणून गेलं. माझा वसंता मला फसवणार नाही असं तिचं मन तिला ठामपणे सांगत होतं.
गायत्रीचे सुख ,चैन तहानभूक सगळचं हरपून गेल होतं. घराच्या गच्चीत ती अस्वस्थपणे चकरा घालत होती. दोन व्यक्तींना तिने काकांच्या खोलीकडे जाताना बघितलं. एवढ्या रात्रीचं काय काम असेल ?कोण असेल? ती दबक्या पावलांनी त्यांच्या खोलीजवळ गेली. दारातून प्रकाशाची किरण बाहेर येत होती म्हणजे दार उघडच होतं.
"हा, हा, भाऊ तसंच करतो"
"ही पोर हातची गेली तर पुढच्या पोरींची लग्न कशी व्हायची. त्याच्यापेक्षा त्याला इथपर्यंत भिडू देऊ नका. एवढी जरब असताना ही प्रेमात पडलीच कशी?"
"ही जुनी गोष्ट आहे साहेब,"
"मूर्खांनो तुम्ही नीट तपास केला नसेल, कॉलेज शिवाय पोरगी घरातून कुठेच बाहेर गेली नाही.चला, निघा तुम्ही. कुणाला संशय यायच्या आधी, काम झाल्यावर तुमच्या वाटा घेऊन जायचा"
हे ऐकून गायत्री जागच्याजागी सर्दच झाली. काका एवढ्या खालच्या पातळीला गेले. काय करणारे ते नक्की तिला कळत नव्हतं. तिने तिच्या वडीलांकडे धाव घेतली.
"बाबा वसंताचा जीव धोक्यात आहे हो काहीतरी करा माझं खूप प्रेम आहे त्याच्यावर"
"गायत्री अगं काय बोलते? कोण वसंता, माझ्या काही लक्षात येत नाही."
"मला बघायला आले होते ते प्राध्यापक वसंत. काकांकडे आता दोन माणसं आली होती. काहीतरी सांगितलं त्यांना काकांनी. बघा ना काही तरी करा."
गायत्री घायकुतीला आली होती तिच्या वडिलांना कोणताच संदर्भ लागत नव्हता.
"आता खूप रात्र झाली आहे. झोप सकाळी उठल्यावर काहीतरी करतो असं सांगून त्यांनी झोपून घेतलं"
कधीही घराची पायरी उतरून न गेलेली गायत्री. तिने पहाटेच मुंबईची बस धरली. कधीतरी वसंता कडून लिहून घेतलेला पत्ता तिच्या कामी आला.
ती मुंबईला पोहोचली तेव्हा आकाशात रंगबिरंगी रंगांची उधळण होत होती. माणसांचे लोंढेच्या लोंढे धावताना दिसत होते. बसमधून टॅक्सी आणि टॅक्सीतून वसंताच्या सतरा मजली इमारती समोर ती येऊन थांबली.
इकडे वसंता रात्रभर बेचैन होता. लिफ्ट मधून उतरताना काचेतून त्याला गायत्री ओझरती दिसली. खरंच गायत्री होती की भास झाला. लिप्टमधून खाली आला तेव्हा तिथे त्याला कोणीच दिसलं नाही.
इमारतीच्या गेटमधून तो बाहेर पडला. दोन इसम त्याच्या मागे मागे चालत होते.पण त्यांने दुर्लक्ष केलं. थोड्याच अंतरावर वसंताला दोघांनी पकडलं.
"मुंबईचे पाहुणे तिकडं गावाकडच्या गायत्रीचा नाद सोडायचा. काय समजलं का?"
"आणि नाही सोडला तर, हे सांगणारे तुम्ही कोण?"
"आम्ही कोण? काय करायचं पाहुणे. फक्त त्या पोरीच्या वाटेला जायचं नाही.गेलास तर..."
त्यातल्या एकाने त्याच्या गळ्याला चाकू लावला.वसंता आणि त्यांच्यात झटापट सुरू झाली.
"बोल,आता जाशील का तिच्या वाटेला?"
"प्रेमाचा अर्थ समजतो का तुला, अश्या पोकळ धमकींना घाबरत नाही मी"
"पोकळ धमक्या काय?"
त्याने वसंतावर वार करण्यासाठी धारदार सुरा उपसला.लपतछपत त्यांच्या मागून येणाऱ्या गायत्रीने तो वार स्वतःच्या अंगावर झेलला.
"तू इथे कशी...?
"वसंता जीवनाच्या अंतिम सत्यापर्यत पोहचली बघ मी,नकार नाही माझा लग्नाला.तू निघून जा लवकर काकांनी पाठवलेली माणसं आहेत ही. माझ प्रेम सर्मपण मागत होतं".
कोसळणाऱ्या गायत्रीला सावरायला तो धावला.आणि मारेकऱ्यांने सुरा आरपार त्याच्या पोटात खूपसला.
गायत्री आणि वसंता एकमेकाच्या घट्ट मिठीत होते. जगातली कुठलीच शक्ती त्यांना एकमेकापासून अलग करू शकणार नव्हती इतके ते एकरूप झाले होते.
समाप्त.
©® लेखिका-भारती देव.
disclaiimer
सदर कथा अक्षरधन आणि वेलवेट कविशा यांनी आयोजित केलेल्या कथास्पर्धेतील आहे. या कथेतील आशय, विषय, मांडणी ही सर्वस्वी लेखकांची आहे. यातून कोणाच्या भावना दुखावण्याचा हेतू नाही. या कथेचे हक्क लेखकाकडे कायमस्वरूपी आणि वेलवेट कविशा यांच्याकडे ३१ ऑक्टोबरपर्यंत राखीव आहेत. परवानगीशिवाय कुठेही प्रकाशित करू नये.
0 Comments
Please do not enter any spam link in the comment box